
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच महात्मा गांधी रोजगार हमी योजना, महाराष्ट्र या वेबसाईटचं लोकार्पण केलं आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत या योजनेच्या (Mahaegs Portal) माध्यमातून होणाऱ्या कामांची तपशीलवार माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळून त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी मनरेगा (Mahaegs Portal) ही योजना चालू करण्यात आली. या योजनेचा ग्रामीण भागातील जनतेला खूप लाभ झाला. मात्र यातून बऱ्याच तक्रारीही येऊ लागल्या.
शेतकऱ्यांची घेतली जात नाही दखल
काही वेळा या तक्रारींची दखल घेतली गेली, काही वेळा या तक्रारी डावलण्यात आल्या. मात्र आता या तक्रारींची दखल सर्रास घेतली जाईल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च रोजी मनरेगा, महाराष्ट्र या वेबसाईटचं लोकार्पण केलं आहे. या माध्यमातून मनरेगा संदर्भातील ग्रामीण लाभार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात येईल.
काय आहे मनरेगा?
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना ग्रामीण भागातील जनतेला वर्षातील किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, या कामातून झालेल्या आर्थिक कमाईतून त्यांचं जीवनमान उंचवावं अशी ही योजना आहे. 2 फेब्रुवारी 2006 रोजी ही योजना सुरू झाली होती. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात मिळाला होता.
‘अशी’ आहे वेबसाईट
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च रोजी mahaegs.maharashtra.gov. in या वेबसाईटचं लोकार्पण केलं. या वेबसाईटवरून मनरेगाची सध्या चालू असलेली कामं, डॅशबोर्ड, विविध तक्रारी इत्यादींची माहिती मिळवता येणार आहे. तसेच पूर्वी दाखल केलेल्या तक्रारींचं निवारण झालं आहे की नाही हेही तपासता येणार आहे. अशा रीतीने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून फायदा होणार आहे.
‘अशी’ नोंदवा तक्रार
- mahaegs.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
- यानंतर ‘तुमची तक्रार नोंदवा’ या ऑप्शनवर क्लिक करा.
- यानंतर जे पेज ओपन होईल तिथे आपला मोबाईल क्रमांक मागितला जाईल. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर साइन इन करण्यासाठी एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन होईल.
- यानंतर पुढे आपलं नाव विचारलं जाईल. त्यानंतर डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड वर ‘नवीन तक्रार नोंदवा’ या ऑप्शन वर क्लिक करा.
- यानंतर मागितलेले तपशील योग्यरीत्या भरल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल
अशाप्रकारे मनरेगाच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आपल्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.