लाकूडतोड्याची कुऱ्हाड वारुळावर पडली अन् भक्तांच्या कल्याणासाठी स्वामी

‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ, हे अनेक श्रद्धाळुंचे श्रद्धास्थान. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले, गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती, हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, असे म्हणतात. “मी नृसिंहभान असून, श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे” , हे स्वामींचे उद्‌गार, ते नृसिंहसरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. 

श्री स्वामी समर्थ १९ व्या शतकात होऊन गेले.  विविध ठिकाणी, स्वामी विविध नावांनी वावरले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा, जेव्हा ते अक्कलकोटनगरीत आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. 

इ.स. १४५९ मध्ये, स्वामींनी गाणगापुरात  श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना, त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रगट व्हायचे ठरवले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज.

आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली, ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी, उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ असे भ्रमण करत सोलापुर व अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते. त्यांच्या या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत दिले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started